कातरवेळ.....पुन्हा येईपर्यंत

पुन्हा आली कातरवेळ,
पुन्हा आठवणींचं जाळं पसरु लागलं सभोवार...
पुन्हा एक नवी मैफ़ल सजेल आता आठवांची
,पुन्हा एकदा मी माझा उरणार नाही...
पुन्हा एकदा मी एकटा ठरणार नाही...
गेलेले कित्येक क्षण आता पुन्हा भेटतील मला...
आणी हो, या प्रत्येक क्षणाबरोबर तू आठवशील...
तुझं हसणं आठवेल, तुझं रुसणं आठवेल..
तुझं असणं आठवेल, तुझं नसणं आठवेल...
तू गायलेल्या ओळी आठवतील....
ती रातराणी आठवेल, तो प्राजक्तही आठवेल...
ती गुलाबी सांज, ते सागर किनारे आठवतील....
तुझं लाजणं आठवेल,
माझ्या मिठीत तुझं हळुवार थिजणं आठवेल....
सारं सारं आता एक एक करुन डोळ्यासमोर येईल..
तो चंद्र ज्याला बघुन तू काही निरोप पाठवायचीस माझ्यासाठी
तोही आठवेल आता...
ए, तू आजही तसेच निरोप धाडतेस का गं माझ्यासाठी?
सांग ना...बघं, चंद्र तर कधिचा आला आहे....
......
ठाऊक असतं मनाला,
या जाळ्यात आता मी गुंतलो जाणार,
वेढलो जाणार पुरता....
अगदी स्व:तलाही विसरेल इतका...
पण तरीही वाटतं,
वेढुन घ्यावं स्व:तला या आठवणींच्या जाळ्यात....
कातरवेळ पुन्हा येईपर्यंत.....

दगड

कधि पाऊस झेलायचा, कधि वादळ पेलायचा
कधि उन्हात तळपायचा, कधि थंडीत कुडकुडायचा .... तो होता एक दगड!
एकलाच होता, त्याला वाटायचं आहोत आपण एकलेच...
सवय करुन घेतली त्याने एकलेपणाची.
तो आणी त्याचं एकलेपण जगायचे एकमेकाची साथ देतज
गात राहुनही जगापासुन खुप खुप दूर
कधि वाटलं नाही जगात यावं...
थोडसं जगासारखं जगावं...
जगाला एका वेगळ्या नजरेनं बघावं...
आनंद मानलेला त्यानं त्याच्या आयुष्यात...कारण तो होता एक दगड!
एक दिवस खुप वेगळा उगवला.
कुठुनतरी कुणीतरी आलं...अगदी अचानक...
तो चक्रावला जरासा, इतक्या आनंदाची सवय नव्हती कधि त्याला.
ते कुणीतरी त्याला फ़ुलं वाहुन गेलं...
ते कुणीतरी त्याला नजर भरुन पाहुन गेलं...
जग अचानक बदललं..
उन, वारा, पाऊस आता त्याला आपलेसे वाटू लागले...
कुणीतरी आपल्याला मानतं म्हणुन दगडालाही पंख फ़ुटु लागले...
असेच दिवस सरत चालले..
.त्या दगडाला कुणीतरी देवपण दिलं..
.कुणीतरी त्याचं एकलेपण नेलं...सारं कसं अचानक झालं...
पुन्हा एक दिवस वेगळा उगवलाज्यानं देवपण दिलं तेच त्याला म्हटलं,
"तू आहेस एक दगड..."
"तू आहेस एक दगड..."
शब्द - संदीप सुरळॆ

हाक - गझल!

आसवांच्या पावसाला हाक देतो
आठवांच्या पाखराला हाक देतो

गायली तू माझिया गझलेस जेथे
मी पुन्हा त्या मैफलीला हाक देतो

काय होते सांग नाते आपले ते?
कोण माझे मी कुणाला हाक देतो?

गाव माझा दूर ना, मी दूर आहे
थांबलेल्या पावलाला हाक देतो

रात होता, गर्द मी काळोख होतो
एकटा मी हुंदक्याला हाक देतो

वाटते की आवरावा हा पसारा
संपताना संपण्याला हाक देतो?

शब्द - संदीप सुरळे

शोध - ग़ज़ल !

कोण माझे ? मी कुणाचा शोध घेतो?
जे संपले , मी तयाचा शोध घेतो

पेटलेल्या या उन्हांना सोसताना
माझिया मी सावलीचा शोध घेतो

कोरड्या या पापण्यांना ओल देण्या
आसवांच्या वाहण्याचा शोध घेतो

चांद राती साथ होती कैकदा तू
मी अताशा आठवांचा शोध घेतो

चोर होई रात माझ्या अंगणी या
मी दुपारी चांदण्यांचा शोध घेतो

हुंदक्याला जोर येतो सांगताना
मीच आता त्या यमाचा शोध घेतो.....संदीप सुरळे

मन पाखरु पाखरु

मन पाखरु पाखरु
वेड्या मायेच्या आभाळी
मन शिकार शिकार
वेडी माया ही शिकारी

मन कधि वार्‍यावर
मन कधि थार्‍यावर
वेडे मन भिरभिरे
कधि भुईवर, कधि चांदतारे

उमजेना मज
मन समजेना मज
मन गुंत्याचाच गुंता
गुंतते अजुन त्यास सोडविता

रुप नाही त्यास
नाही कुठलाच साज
परी ते इतके चंचल
की ना कुणा उमगलं

मन शब्दात येईना
मन माझेही होईना
मन परके परके
मन मनाच्याच सारखे
--संदीप सुरळॆ

गैर येथे

गालगागा गालगागा गालगागा
***************************
हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे

फूल नाही मी कुणीही हुंगलेले
तू मला का माळणेही गैर येथे?

आठवांशी का अताशा वैर झाले
आठवांना चाळणेही गैर येथे

काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?
सोवळ्याला पाळणेही गैर येथे

पान मी एक त्रासलेले...संपलेले
संपताना वाळणेही गैर येथे

चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?

तू म्हणालीस



जरा थांबलो होतो मी कुठे
तू म्हणालीस थांबणे गैर येथे

जरा कुठे गळाली आसवे दोन माझी
तू म्हणालीस रडणे गैर इथे

मी होतो माझ्यात गुंतलेला
तू म्हणालीस एकटे चालणे गैर येथे

मी चुकलोच होतो अताशा
तू म्हणालीस मैत्रीच गैर येथे...

तू...मानव जातीवर झालेला बलात्कार

तू नराधम....तू यम..
तू अंत...तू एक खंत...

तू क्रुर...तू असुर...
तू दंश...विनाशाचा अंश...

तू ग्रहण...तू मरण...तू
अंधार...तू भुमिचा भार...

तू अंध...तू मदांध...
तू मानव? तू दानव...

तू बलात्कारी...तू मारेकरी....
तू विनाश...तू सर्वनाश....

तू...मानव जातीवर झालेला बलात्कार
तू...मानव जातीची झालेली हार
शब्द - संदीप सुरळे

वेदना बोलायला लागल्या तर

वेदना बोलु लागल्या तर
त्या हजार जिभांनी ओरडतील
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेचा
आक्रोश खोडुन काढतील

मीच श्रेष्ठ असं म्हणत
वेदना-वेदनांमध्ये चुरस लागेल
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेकडं
मग तुच्छतेनं बघेल

मनात, तनात, घरात, दारात
फ़क्त वेदना दिसु लागतील
काहीच उरणार नाही कुठं
सर्वत्र फ़क्त वेदनाच भासु लागतील

पण...
पण वेदना बोलायला लागल्या तर
ऐकायला कुणीच उरणार नाही
कदाचित म्हणुनच सार्‍या वेदना
मौन पांघरुन शांत निजल्या आहेत..प्रत्येकात...

"आया"

तू म्हणालीस...
आता आपण आपलं घर थाटूया
आपल्या दोघांच्या संसारात दोघंच नटुया

तशी नेहमीच सवय...
मला तुझ्या हो ला हो म्हणायची
तू सांगशील अगदी तसं वागायची

मन कावरं बावरं झालंही जरासं
आईवडिलांपासुन दूर जाताना
आजवर तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे जपलं
त्यांना वार्‍यावर सोडताना

आता जरी आलो आपल्या घरात..
इथं आपलेपणा नाही गं जाणवत..
इथं काही तुझं आहे अन काही माझं..
खरं खुरं प्रेम आत इथं नाही पाणवत...

अन काल तू म्हणालीस...
तुझ्या आईला बोलावुन घे...
"आया" परवडणार नाही
अन ह्याचं सारं करणं मला काही जमणार नाही...

--संदीप सुरळे