कधी कधी मन उधाण वारा

कधी कधी मन उधाण वारा
भांबावते कधी कधी सैरावैरा
तडफ़डते कधी क्षीतिजावर ते
कोण कुठे अन कसा निवारा?

शोधू पहातो मीच मला मग
अवतीभवती तुझाच दरवळ
तुझ्या मिठीची शाल ओढुनी
श्वासांमध्ये तुझाच परिमळ

अलगद येते स्वप्ने लेवुनी
गुलाब होते रात्र लाजरी
बावरते तू सावरते तू
खुलुन येते मिठी साजरी

सये,
मन लाट होताना
तू किनारा होऊन येतेस
पेटलेल्या या वादळाला
नकळत शमवून नेतेस
--शब्द्सखा!

प्रेम म्हणजे एक महोत्सव!

प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.

एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्‍या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"

प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!

कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.

कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!

मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.

अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्‍या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्‍यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्‍या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणा‍री आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.

त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.

हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.

तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.

तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.

खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.

कृष्णविवर..खोल अतिखोल!

दूर दूर अंतराळात
एक ठिपका आहे..इवलासा
अगदी काळाकभिन्न राक्षस वाटणारा
कुरूप इतका की प्रकाशानंही दूर रहावं
काय इतकं साठलं असेल त्याच्या अंतरात?
का इतकं दूर गेला असेल तो?
की चंद्रतारेच त्याच्यापासून दूर राहत असतील?
त्याला नक्की कसली ओढ असेल?
एखाद्या चंद्रानं त्याचीही परिक्रमा करावी?
रात्रीच्या अंधारात अंधार होऊन हरवताना,
त्यानंही कुणासाठीतरी लुकलुकावं?
हजार प्रश्न असतील असे...
जरासं डोकावून बघावं म्हटलं गाभ्यात,
पण पुन्हा आठवलं..हे तर कृष्णविवर..खोल अतिखोल!
मलाही ओढून घेईल आतमध्ये..
किती वेदना?
किती दु:ख?
आणि शेवटी अंत..
पण कुठवर?
एक ना एक दिवस,
त्याचं महाकाय गुरुत्वाकर्षण भारी पडेल असं वाटतंय...
आणि मग ओढला जाईल मी..
खोल खोल खोल..
कुठवर ते माहीत नाही....


दोघांमधील अंतर जपायचा प्रयत्न करतोय
पण अंतर कमी होत चाललंय आजकाल..

--शब्द्सखा!

माझिया वेदनांना कळाया लागलो मी

माझिया वेदनांना कळाया लागलो मी
होउनी रात आता ढळाया लागलो मी

सावल्या दाटल्या का अशा या पेटताना
राहुनी मौन आता जळाया लागलो मी

बोलुनी श्वास गेले ’पुरे हे खेळ आता’
माझियापासुनी अन पळाया लागलो मी

जाहले ओस सारे पुन्हा मी कोरडा रे
माझिया आसवांना छळाया लागलो मी

--शब्द्सखा!

आई गं!

आई गं!
आठवत असशील मला
तुळशीपाशी दिवा लावताना
देवाजवळ शुभंकरोती म्हणताना
भल्या सकाळी अंगणात सडा घालताना
गोड धोड बनवल्यावर हट्ट करायला मी नसताना
ओवाळण्यासाठी भाऊ जवळ नाही म्हणून बहिण रडताना
तुला समजावताना बाबांचाही आवाज नकळतपणे कापरा होताना
दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी परतणारी इतरांची मुलं पाहताना
एखादी आई आपल्या बाळासाठी अंगाई गाताना
लहाणपणी दाखवलेला चांदोबा बघताना
बाजारात गेल्यावर खाऊ घेताना
फ़ोनवर बोलून झाल्यावर
अश्रू ढाळताना
आई गं!
--शब्द्सखा!

आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

'विसावायचे मज सावलीत आई
निजायचे पुन्हा ऐकायची अंगाई'
शब्द हे माझे तीला ऐकवा रे
आईस माझ्या माझा निरोप द्या रे....

समई जळते जरी, देवघर पोरके
डोळ्यात दाटते आई,खळकन ओघळते
ममतेस तिचिया गातात आसवे रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

जाहली सांज पाखरे निघाली घराला
उब मायेची गाईच्या पाडसाला
उंबरा माझ्या घराचा पोरका रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

अंगणात जाता जरा संथ व्हा रे
'शुभंकरोती’ गाता तुम्ही गुणगुणा रे
ममता मायेची घेउनी या रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

ढाळेल आसवे ती ऐकुनी बोल माझे
काळजास तिचीया भले जाणतो मी
शब्दहो शेवटी तुम्ही मौन व्हा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

शब्दहो आज तुम्ही उडून जा रे
आईस माझ्या माझा निरोप द्यारे....

--शब्दसखा!

कुठे असशील तू?

कधीचा मौन मी
तुझ्या आठवणींशी पुन्हा बोलका होऊ लागतो
गर्भश्रिमंत शांततेतही
तुझ्या आठवणींचा गलका होऊ लागतो
आभाळ भरल्यागत मन भरुन येतं
डोळ्यात पाणी डबडबत..अडखळत..
मन तळमळत..तडफ़डत..
तुझ्या आठवणींशी झगडतं...
कातरवेळ..अजुन गहिरी होऊ लागते..
तसे तुझे भास गडद होत जातात...
मी विरत जातो मंद काळोखात... संथ होत होत
स्व:तला शोधू पाहतो...माझ्यात...तुझ्यात..
कुठे असेल का मी?
की तुच फ़क्त सगळीकडे?
कुठे असशील तू?
माझी असलीस तरीही....कुठे असशील तू?
--शब्द्सखा!

इतुकेच आज झाले

इतुकेच आज झाले सारे कळून आले
का दु:ख अंतरीचे हे भळभळून आले

झाले नको नकोसे होते पुन्हा पुन्हा जे
ते स्वप्न का अताशा मागे वळून आले?

होऊन वागलो मी माळी तुझ्या महाली
केसूंत फ़ूल तुझिया ते दरवळून आले

माझ्यात दंगलेलो झिंगून लास होतो
झाली पहाट ना अन तारे ढळून आले

मी जिंकलो जरीही उरलो किती कितीसा?
माझेच श्वास जेव्हा मजला छळून आले

ही वाहवा निघाली आता नको तयांची
सांगू कसे कुणाला मज हळहळून आले

--शब्द्सखा...१५.१०.०८

वरात

कुठलेच दु:ख आता माझ्या घरात नाही
काहीच आज 'तसले' उरले उरात नाही

माळून चांदण्यांना तू दूर दूर गेली
हरवून चांद गेला तो अंबरात नाही

वाटा कधीच सार्‍या इथल्या गळून गेल्या
पाऊल थांबलेले आता भरात नाही?

मागू नको मला तू आता उधार काही
झालो फ़कीर तुजविण तू अंतरात नाही

मी जिंकलेच असते इवल्या दिशांस दाही
का ओढ या फ़ुलाची त्या भ्रमरात नाही?

घे तू..रडून घे तू मी थांबणार नाही
अद्याप पाहिली तू असली वरात नाही

--शब्द्सखा!

तुम्हे ढुंढ रहा है प्यार

पतंग आणि दोरी..एक अनोखं नातं. अपुर्ण एकमेकांशिवाय दोघंही.
दूर दूर उंच आभाळात स्वैरपणे विहारणारा पतंग अन त्याच्यासंगे मोठ्या दिमाखात मिरवणारी दोरी. तसं पाहीलं तर पतंगामुळे दोरी नसते, तर दोरीमुळे पतंग असतो. दोरी म्हणजे बंधन असतं पतंगाचं. त्याचं हसणं, रडणं, असणं, नसणं, वादळात हेलकावणं, कधी वार्‍यासोबत डोलणं सारं सारं या दोरीसोबत. पतंगाचा प्राण दोरीत विसावलेला. असं हे अतूट नातं...अतूट बंधन.
एक दिवस असेच दोघं मस्तीत डूलत होते. पतंग आभाळातून दोरीला न्याहाळायचा. दोरी आपली लाजायची, पतंगाला इतकं उंच पाहून हरपून जायची. आणि आपली गाठ याच्यासोबतच जुळलेली आहे हे आठवून मनातल्या मनात हजारदा त्याला वरायची. मध्येच एखादा हवेचा झोका यायचा पतंग थोडा खाली झुकून दोरीला स्पर्शायचा...दोरी गुलाबी होऊन जायची. रंगात यायची. वार्‍यावर तीही डूलायची मग.
असा हा डाव रंगत असतानाच आभाळ भरून आलं. दोरी अन पतंगाचं घर असणार्‍या निळ्या आकाश ढगांनी भरुन आलं. वारा उधळून आला. झाडं वार्‍याशी भांडायला लागली. फ़ूलं धूळीनं माखली गेली. पालापाचोळा आभाळापर्यंत जाऊन घिरट्या घालायला लागला. विजांनी थैमान घातलं. क्षणापुर्वीचं सुंदर जग बघता बघता क्रूर झालं.
वादळात पतंग स्व:तला कसातरी सावरत होता. दोरीची नाजूक कुडी पतंगाला जमेल तसा आधार देत होती. सारं सारं सहन करुन पतंग एका ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरुन दोरीला हेलकावे बसणार नाहीत. दोरीसाठी त्याचाही जीव तुटू लागला. इतक्यात वार्‍याच्या एका जोरदार तडाख्याने पतंगालं भिरकावलं. पतंग अन दोरीची गाठ सुटली. हळूहळू दोरी खाली कोसळू लागली. पतंगापासून दूर दूर चालली. इतका वेळ अतूट असणारं बंधन एका क्षणात तूटलं गेलं. अंधारल्या डोळ्यांनी दोरीने अखेरचं पतंगाला पाहून घेतलं आणि शेवटी भुईवर शांतपणे निजून तीने डोळे मिटले.
पतंगाने दोरीसाठी आक्रोश केले. हजार आवाज दिले त्याने तिला. त्या वादळात त्याचे आवाज विरुन गेले. अश्रू ढाळले त्याने. पण दोरी मात्र कधीच स्थितप्रज्ञ झाली होती.
इतका वेळ विहारणारा पतंग आता फ़डफ़डायला लागला होता. दोरीशिवाय खचलेला पतंग तिच्या जाण्यानेच निम्मा अर्धा संपला होता. इतका वेळ आभाळाला पंखांखाली घेणार्या पतंगाचे पंख गळून पडले होते.
वादळ वार्‍याला सोसत, वारा नेईल तिकडे तो जाणं आता त्याच्या नशिबी होतं.
नजर अजुनही दोरीवरच होती .
दोरीनंतर शेवट तर आपलाही आहेच हे कळुन चुकलं त्याला. आपण दोरीला वाचवू शकलो नाही ही खंत मनाला बोचत होती.
वार्याच्या तडाख्याने कधी उंच आभाळात जायचा कधी कोसळायचा. त्यातच पावसाने जोर धरला. वारा आणि पाउस यांनी एकत्रच त्याच्यावर वार सुरु केले. कसा टिकणार होता तो?

बरेच दिवस झाले. कदाचित बरीच झुंज दिली असेल त्याने. अन आज..आज तो कुठेतरी एखाद्या माळरानावर निपचीत पडला असेल जिर्ण झालेला. फ़ाटलेला. किंवा एखद्या काट्याच्या झाडामध्ये अडकलेला असेल शेवटच्या घटका मोजत..दोरीला आठवत.
दोरी एका क्षणात निघून गेली. पण तिच्यामागे पतंगही भरकटलाच.
बंधन तुटलं..पतंग बेबंध झाला. आणि अशा पतंगाला वादळ रों रों करत घेऊन गेलं.
कदाचित लवकरच दोघांची भेट होईल एका शांत ठिकाणी जिथं पुन्हा दोघांचं जग असेल.
पण तोवर...तोवर पतंगाला सोसायचंच आहे.

तसं कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. वेळ थांबत नाही. हे खरं.
दोरीशीवाय जगायचा प्रयत्न पतंगानेही केलाच. पण कदाचित पतंग सर्वसामान्यांमध्ये मोडला नाही म्हणून दोरीशिवायचं जगणंही त्याला जमलं नाही.
आपलंही आयुष्य या पतंग-दोरी सारखं नसू शकत का?
आपल्यालाही आपलं कुणीतरी खुप जवळचं अचानकपणे सोडून जातं. जाणारी व्यक्ती निघून जाते.. सुटते. पण जाताना मात्र खुप सार्‍या वेदना देऊन जाते. आठवणी मागे ठेउन जाते.
अन मग आपल्या वाटेला येतं ते त्या आठवणींना कुरवाळत बसण. त्या विरहात जळणं.
अहं..हे लादलेलं नसतं. पण का कुणास ठाऊक आपणच ते लादून घेतो स्व:तवर.
ते रुसवे, फ़ुगवे. त्या सांजवेळी. प्रत्येक श्वासागणीक काढलेल्या त्या आठवणी. ती स्वप्नांची बांधलेली घरं.
सारं सारं अर्धवट राहून जातं. अधुरी राहिलेली वचनं, प्रेमात घेतलेल्या आणाभाका. ही सगळी कोरी चित्र एकट्याने कशी रंगवायची.
दिवसामागून दिवस येतात..निघून जातात. आपण मात्र शुन्य असतो. भावनाशुन्य! सगळ्या भावना त्या एका क्षणातच विरुन गेलेल्या असतात. पुरते रुक्ष झालेलो असतो आपण.
पुन्हा तशी सांज कधी खुलत नाही. फ़ुलांना गंध येत नाही.
पाऊस कोसळत राहतो पण आपण भिजत नाही. भिजतं ते फ़क्त तन. मनातून मात्र कोरडेच राहतो आपण .
आठ्वणींना आठवत एक एक क्षण कसातरी पुढे ढकलायचा. चालत रहायचं. कुठे जायचं ते ठाऊक नाही. कुठवरं चालायचं हिशोब नाही. का चालायचं ठरलेलं नाही. इतकच माहीत की शेवटापर्यंत जायचं.
सारं असून काहीच नसल्याचं जाणवत राहतं, आणि सगळं असलं तरी त्या कुणातरीशिवाय ते अपुर्ण वाटत. जीवन अपुर्ण वाटतं.

तुझ्या माझ्याबाबतीतही असं काहिसं होऊ शकतं ना?
कदाचित तू मला सोडुन जाशील. मी मागे उरेल एकटाच.
पण एक बरं होईल की तू मला बघू शकणार नाहीस. नाहीतर जगण्याला कफ़ल्लक झालेल्या मला पाहताना तुझं मन रडलं असतं. कोसळून गेली असतीस तुच.

एकटं बरेच जण जगतात. पण एकाकीपणात जगायला धैर्य लागतं.
मग खोटं खोटं हसू चेहर्‍यावर ओढून जगणं हा शाप ठरतो. कुठेही नसून उगाचच सगळ्यांत असावं लागतं.
मनाची तडप, तडफ़ड, रुदण कुणाला दाखवता येत नाही. कुठं ते व्यक्त होत नाही.
अबोल राहून सगळं सोसायचं असतं. हळूहळू तेही जमू लागतं.
आभासांचं जाळ पसरु लागतं सभोवार. नजर उगीचच त्या जुन्या वाटेभर भिरभिरते.
जुने क्षण आठवण होऊन एकत्र येतात. त्यांच एक वलय बनतं आपल्याभोवती. त्या वलयातच आपण जगणं पसंत करतो मग. जगापासून हळूहळू परके होऊ लागतो.
अवघड जातं हे सारं सारं सहन करणं. एक वेदना दिनरात, प्रत्येक क्षणी काळजात ठसठसत राहते.
ही वेदना भळभळून वाहत नाही, अन खपलीही धरत नाही. ती अशीच चिघळत राहते. शेवटपर्यंत.

ते गाणं आहे बघ एक,

"अब यादों के काटे इस दिल मे चुभते है,
ना दर्द ठहरता है, ना आसू रुकते है,
तुम्हे ढुंढ रहा है प्यार..हम कैसे करे इकरार ,
के हा तुम चले गये..."

हे गाणं समजलं तर सगळं समजलं. या गाण्यातच सगळं आलं.

--शब्द्सखा!


( ’चिठ्ठी ना कोई संदेश...’ लिहून खो दिल्याबद्दल सईचे आभार.)